‘पिंजरा’ सिनेमा फुलवणारा चेहरा काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन. मुंबई -मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या नृत्यकौशल्याने आणि अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे(4 ऑक्टोबर) निधन झाले आहे. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

संध्या शांताराम या दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या पत्नी होत्या आणि त्यांच्या अनेक चित्रपटांत त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाची माहिती भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली. त्यांनी लिहिले – “‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांनी आपल्या अभिनय आणि नृत्याने चित्रपटसृष्टीत अजरामर ठसा उमटवला.”. पिंजरा’, ‘नवरंग’ आणि ‘झनक झनक पायल बाजे’सारख्या चित्रपटांत त्यांनी गाजवली भूमिका
संध्या यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले. १९५९ मध्ये आलेल्या ‘नवरंग’ या चित्रपटातील “अरे जा रे हट नटखट” हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात ताजं आहे. या गाण्यासाठी त्यांनी खास शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. सेटवर खरे हत्ती आणि घोडे असतानाही त्यांनी निर्भयपणे नृत्य केले. त्या काळात बॉडी डबल न वापरता स्वतःच नृत्यदृश्य पूर्ण करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं होतं.
‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘पिंजरा’ आणि ‘अमर भूपाळी’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी भारतीय चित्रपटसृष्टीत नवा मापदंड निर्माण केला. विशेषतः ‘पिंजरा’ मधील त्यांच्या सोज्वळ पण दमदार भूमिकेने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली.
विजया देशमुखपासून संध्या शांतारामपर्यंतचा प्रवास
संध्या शांताराम यांचं मूळ नाव विजया देशमुख असं होतं. अत्यंत समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेमात स्वतःचं वेगळं स्थान मिळवलं. दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या कलात्मक दृष्टिकोनात त्यांनी स्वतःचा तेजस्वी ठसा उमटवला. त्यांच्या अभिनयात स्त्रीच्या भावनांना, संस्कारांना आणि सामर्थ्याला नेहमीच केंद्रस्थानी स्थान मिळालं.
त्यांचं सौंदर्य, भावपूर्ण चेहऱ्यावरील भाव आणि नृत्यकौशल्य या सर्वांनी त्यांना त्या काळातील अग्रगण्य अभिनेत्रींपैकी एक बनवलं. आज त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. संध्या शांताराम यांचा प्रवास फक्त सिनेमापुरता नव्हता, तर तो भारतीय चित्रकलेच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा अध्याय होता. त्यांची स्मरणीय गाणी, नृत्यदृश्ये आणि अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील.
